खरेचं आयुष्यातील काही क्षण फारचं सुंदर असतात. मी तर म्हणेन काही सुंदर क्षणांमुळेच आयुष्य सुंदर होऊन जाते.शाळेच्या वहीत जाळी झालेले पिंपळाच पान जपून ठेवावे तसे काही क्षण आयुष्याच्या ह्रदयरूपी वहीत कायमचेच कोरलेले असतात. आपल्या नकळतच हे क्षण अलगदपणे मनाच्या एका कोपऱ्यात विसावतात आणि मग तयार होतो एक सुंदरसा,नाजूकसा "आठवणींचा धागा". जशी श्रावणातल्या संध्याकाळी एक हळुवार पावसाची सर मनाला चिंब भिजवून जावी अगदी तसेच हा धागा संध्याकाळ जवळ आली की मनाला चिंब भिजवून जातो.फरक फक्त एवढाच की पाऊस थेंबानी भिजवतो तर हा धागा आसवांनी...
आयुष्याच्या पाऊल वाटेवर कधी थांबलो तर कधी चाललो.जगण्याच्या या वाटेवर कधी ठेच लागून पडलो,तर कधी पडता पडता सावरलो.आयुष्याच्या या खडतर वाटेवर,एक नवीन अतिशय सुंदर नाते जोडत गेलो.नाते माझे आणि त्या हळुवार क्षणांचे,जे व्यक्त करताना आज मला जाणवते की शब्द किती तोकडे आणि पोकळ असतात ना? शब्द हे त्या पाण्याच्या बुडबुड्या प्रमाणे असतात, त्यांना काहीच अर्थ नसतो… त्यामागे असणाऱ्या भावनाच त्यांना सहज,सुंदर बनवतात. माझे आणि या हळुवार क्षणाचे नाते म्हणजे "आठवण"... एक एक फुल गुम्फुन जसा नाजूक, सुंदर सा गजरा माळावा अगदी तसाच एक एक हळुवार क्षण आठवणीच्या धाग्यात गुम्फुन मी "आठवणीचा गजरा" माळला आहे.
आयुष्यात काही क्षण कोणत्यातरी कारणांमुळे आले,तर काही कोणत्यातरी ऋतुसाठी आले पण फार मोजकेच क्षण आहे जे कोणत्याही कारणांवीणा आले आणि सदाबहार फुलांप्रमाणे कायमचेच मनात स्थिरावुन गेले. आठवणीच्या या नात्यात मी रोज बघतो ते निरागस बालपण. आजही डोळ्यासमोरून तरळुन जातात ते खेळण्याचे,बागडण्याचे,फुलण्याचे आणि बालपणीच्या सवंगड्याच्या निस्वार्थ मैत्रीचे निरागस क्षण. आजही कोऱ्या कोऱ्या करकरीत वह्यांचा सुगंध मला माझ्या शाळेत घेऊन जातो तर पावसाच्या अगोदरचा मातीचा सुगंध माझ्या मावळ्यांच्या संगतीत...मला अगदी स्पष्टपने आठवत आहे मला मोठे मोठे स्वप्न पाहावयास शिकवणारा,उंच उंच भराऱ्या घेणारा तो रंगीत पतंग...," हा पतंग की पाखरू,म्हणे मज आकाशी चल उडु..." हे गाताना जणु मला गगन भरारी शिकवणारा. मला आजही आठवतो तो माझा ठरलेला बेंच.शाळेच्या ग्राउंड वरील ते सकाळचे कोवळे,सोनेरी ऊन आजही मला वर्गाबाहेर फुटबॉल खेळण्यास बोलावतात.आजही मी आतुरतेने वाट बघत आहे मधल्या सुट्टीची,मित्राचा डबा मी खाण्याची आणि माझा डबा मित्राने खाण्याची.आजही मला आठवतो तो मराठीचा तास ज्याला सरांनी कुसुमाग्रजांची "कणा" हि कविता शिकवली होती. आजही त्या कवितेच्या ओळी नकळतच ओठांवर येतात...
ओळखलत का सर मला !
पावसात आला कोणी ?
कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी.
.
.
मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा
पाठी वरती हाथ ठेऊन नुसते लढ म्हणा !
नुसते लढ म्हणा ...
खरेचं आजही मला वाटत की, मी जे काही करत आहे ते करताना माझे सर मला बघत आहे आणि सरांचं नुसतं लढ म्हणन ही भावनाच फार स्पुर्तीदायी आहे.
आजही मला आठवते ती गावाकडील अविश्वशनीय सकाळ,ते किलबिलनारे पक्षी,ती खळखळनारी नदी,ती बाबांनी रेडिओवर लावलेली भावगीते.आजही आईच्या अंगाई गीतांचे स्वर माझ्या कानात गुणगुणत आहे.आजही वाटते की ताईशी मनसोक्तपणे भांडावे,तीची मुद्दामच खोड काढावी.Match fixing ने बरबटलेल्या क्रिकेटच्या लाघवी दुनियेत दादासोबतच खेळलेलं क्रिकेटच जास्त प्रामाणिक आणि आनंदायी वाटते. वाटते की नकोच ते T.V. समोर बसून तासन तास वाया घालवणे,त्या पेक्षा आपल्या मागच्या अंगणात दादासोबातच मनसोक्तपणे परत एकदा खरा "Gentlemens Game" खेळावा.
आयुष्यातील काही क्षण असे असतात की,वाटते की ते कधीच संपू नये...पण क्षणांचे हे असेच असते,नेमके आपण या क्षणांना गोंजारणार की तोच हे क्षण संपलेले असतात.गेलेला क्षण मात्र आपली "आठवण" मनावर कायमचीच कोरून जातो, जशी फुलपाखरे हातांवर रंग ठेऊन उडून जातात.कोणत्या व्यक्तीचं किंवा क्षणांचं आपल्या आयुष्यात येणे किंवा जाणे नक्कीच आपल्या हातात नाहीये पण आहे ते क्षण अजून सुंदर बनवणं हे नक्कीच आपल्या हातात आहे.यावर पाडगावकरांची एक सुंदरशी कविता आठवते...
अपुल्या हाती नसते काही, हे समजावे
कुणी दिले जर हात आपुले, हाती घ्यावे
नकोच मनधरणी अर्थाची नको आर्जवे
शब्दांनी जर मिठी घातली, गाणे गावे
भिरभिरणा-या फूलपाखरा नसेन आशा
विसावले जर, ओंजळीचे तर फूल करावे
आज माझ्या ओंजळीत साठल्या खूप साऱ्या "आठवणी"...आणि त्या वेचण्याचा केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न....
संदिप सामग

No comments:
Post a Comment